श्लोक 39

 

 

श्लोक 39



मोठ्या मिजाशीत फणा काढून फुत्कारणार्‍या आणि इतरांना दहशत निर्माण करणार्‍या नागाला चुकून जरी छोटीशी जखम झाली तरी, मुंग्यांना बरोबर त्या रक्ताचा वास येतो. इतरवेळेला क्षुद्र वाटणार्‍या अगणित मुंग्या जखमेचा मागोवा घेत त्याच्या जखमेला घेरतात, डसतात, पोखरतात, जखम मोठी करतात. आणि बघता बघता कुरतडून कुरतडून त्याचं सर्व शरीर खाऊन टाकतात.

 त्याप्रमाणे आपले ऐश्वर्य, विद्या, प्रत्युत्पन्न मति आणि प्रतिभा दिमाखात मिरवणार्‍या ह्या जगन्नाथाचा राजसत्तेचा आश्रय सुटताच काळ फिरला. त्याची परिस्थती प्रतिकूल होताच, सर्व क्षुद्र मनोवृत्तीचे लोक त्याच्यावर तुटून पडले.  ह्या क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांमधे अपय्यांसारखे पंडितही होते मग बाकींच्यांविषयी काय विचारता. अनेक पात्रता नसेलेलेही पुढे सरसावले नाहीत तरच नवल! सर्वांनी त्याला बहिष्कृत केले. जिणे अशक्य केले.

त्यामुळे अत्यंत उद्विग्न झालेला आणि गंगेला अनन्य भावाने शरण आलेला जगन्नाथराय गंगेला कळवळून म्हणत आहे, ‘माय गे मी माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ह्याचा विचार न करता माझ्या कुशलमंगलाचा, क्षेमकल्याणाच्या चिंतेचा सर्व भार कायमचा तुझ्यावर टाकला आहे.

आज सर्वजण माझ्या विरोधात उभे आहेत. अत्यंत प्रतिकूल काळ माझ्यासमोर ठाकला आहे. माय! आकाशच फाटलं तर त्याला कुठे कुठे ठिगळं लावणार? जगानी माझ्याकडे पाठ फिरवलीच आहे; पण, माय माझ्या अशा कठीण काळात तूही माझी साथ सोडलीस, ह्या तुझ्या लेकराला टाकून गेलीस तर, ‘गंगा शरण आलेल्यांना पदरात घेते’ ह्या लोकांच्या ठाम विश्वासाला प्रचंड हादरे बसतील माय! तीनही लोकातील विश्वास लयास जाईल. लोकांच्या विश्वासालाच तडा जाईल. इतके दिवस असलेला लोकांचा भरवसा अस्तास जाईल. आईशिवाय मुलावर निःस्सीम,प्रेम कोणी करू शकेल का गं?  आता तुझ्या कुशीत शिरण्यासाठी उतावीळ झालेल्या ह्या जगन्नाथाला जर तू झिडकारलस तर, आईचं निर्व्याज प्रेम, निष्कपट करुणा पोरकी होईल माय! तिने तुझ्याशिवाय कोठे जावे?

सदैव त्वय्येवार्पितकुशलचिन्ताभरमिमं

यदि त्वं मामम्ब त्यजसि समयेऽस्मिन्सुविषमे।

तदा विश्वासोऽयं त्रिभुवनतलादस्तमयते

निराधारा चेयं भवति खलु निर्व्याजकरुणा ।। 39 ।।

 

अन्वय – हे अम्ब, सदैव त्वय्येव अर्पितकुशलचिंताभरं इमं मां अस्मिन् सुविषमे समये यदि त्वं त्यजसि तदा अयं विश्वासः ; त्रिभुवनतलात् अस्तं अयते । इयं च खलु निर्व्याजकरुणा निराधारा भवति । (39)

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; सदा एव – नेहमीच ; त्वयि एव – तुझ्यावरच ; अर्पितः – दिला आहे,  स्थिर केला आहे; कुशलचिंताभरम्- कल्याणाच्या चिंतेचा भार ; येन – ज्याने ; इमं मां – ह्या मला ; अस्मिन् – ह्या , सुविषम समये – अत्यंत कठीण, दुस्तर अशा प्रसंगी ; यदि त्वं – जर तू ; त्यजसि – टाकशील, सोडून देशील ; तदा – तर ; अयं विश्वासः – (गंगा शरणागताचे रक्षण करते) हा विश्वास ; त्रिभुवनतलात् – त्रैलो्क्याच्या तळापासून ; अस्तं अयते – अस्तास जाईल, नष्ट होईल ; इयं च खलु – खरोखर ही निरंतर तुझ्या जवळ असणारी ; निर्व्याज करुणा – निष्कपट करुणा, दया ; निराधारा – आधार रहित, पोरकी ; भवति – होईल.(39)


अगे कल्याणाची फिकिर मुळि केली न कधि मी

दिले चिंता-ओझे तुजवर सदा सोपवुन मी ।

सदा विश्वासूनी तुजवरचि निश्चिंतचि असे

परी आता माते समय फिरला पूर्ण मम गे ।। 39.1 ।।

 

अगे दुर्दैवाच्या मजसि बसता क्रूर थपडा

नको सोडू माझ्या बिकट समयी तूच मजला ।

तडा विश्वासासी जननि जर गेलाच तर गे

दयाळू सर्वांसीअशि विमल कीर्ती तव बुडे ।। 39.2 ।।

 

जगा ठावी आहे जननि तव निर्व्याज करुणा

शिशूसी ना देसी, जग म्हणतसे अंतर कदा ।

परी माते जाशी मजसि झिडकारूनच अशी

तरी कारुण्याला कठुनचि उरे आश्रय जगी ।। 39.3 ।।

---------------------------------------------------

Comments

  1. नमस्कार 🙏,
    अतिशय सोप्या अन् रसाळ मराठी मधे संस्कृत शब्दार्थसह विवेचन आहे. वाचताना आपण त्यांच्या कळवळीनी, आर्ततेनी केलेल्या विनवणींचा भावनिक असर आपल्यावर ही होतो.

    शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏 🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3