श्लोक 16
श्लोक 16
हे जननी, तुझं निर्मल जल निसर्गतःच शुद्ध
स्वच्छ शीतल(शिशिरः) आहे. ‘‘शैत्यं हि यत्सा प्रकृतिर्जलस्य,
श्वैत्यं हि यत्सा प्रकृतिर्हिमस्य ।’’
म्हणजे पाणी हे निसर्गतःच थंड असणार आणि हिम निसर्गतःच धवल असणार हा निसर्ग
नियमच आहे. तरीही, हे गंगे तुझं पाणी इतर नद्यांच्या पाण्याहून वेगळं आहे.
श्रेष्ठ, गुणकारी आहे. तुझ्या जळाची जे अनुभूती घेतात, तेच तुझा अपार महिमा
जाणतात.
तुझ्या पाण्याचं अलौकिक सामर्थ्य सगर
राजाच्या मुलांपेक्षा जास्त कोण जाणणार? इक्ष्वाकु कुळातील सगर राजाने अश्वमेध
यज्ञ केला. त्याचा अश्वमेध यज्ञ इंद्राने उधळून लावला. अश्वमेधाचा घोडा पळवून नेऊन
कपिलमुनींच्या आश्रमात बांधून ठेवला. (कोलकात्या पासून साधारण 100 कि.मि. वर गंगासागर
नावाचे बेट आहे. तेथे कपिलमुनींचा आश्रम होता असे म्हणतात. हुगळीनदी आणि बंगालचा
उपसागर ह्याच्या पवित्र संगमावर हे बेट आहे. दर मकरसंक्रातीला तेथे मोठा उत्सव
असतो) सगर राजाचे साठ हजार पुत्र घोड्याच्या शोधात सर्व पृथ्वी पालथी घालून शेवटी
कपिल मुनींच्या आश्रमात पोचले. तेथे घोडा पाहून तो ह्या मुनींनीच पळवला असावा असं समजून
ते त्यांच्या अंगावर धावून गेले; पण कपिल मुनींनी त्यांना आपल्या तपाच्या
सामर्थ्याने क्षणात भस्मसात केलं. शापाने मेलेल्या साठ हजार सगरपुत्रांना मोक्ष
मिळावा ह्यासाठी कपिलमुनींनी ठेवलेली अटही महाकष्टसाध्य असल्याने अशक्य कोटीतील
वाटावी अशीच होती. सगराचा पणतु भगिरथाला जेव्हा
ही खरी कहाणी अवगत झाली तेव्हा आपल्या राज्याचा त्याग करून भगिरथ प्रयत्नांनी हे
निलिंपनिर्झरी, हे देवनदी गंगे तुला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं.
माय, तुझ्या जलात असलेल्या अत्यंत श्रेष्ठ
गुणांमुळे, निर्मळ, शीतल जलाच्या स्पर्शाने जळून राख झालेले सगरपुत्र राखेतून
प्रकट झाले. सगरपुत्रांचा उद्धार झाला. त्यांचे देह तुझ्या स्पर्शाने पुलकित झाले.
त्यांच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले. तुझ्या नामाचा महिमा गात गातच ते
विमानात बसून स्वर्लोकी पोचले. आजही ते तुझ्या गुणांचे अगम्य असा महिमा वर्णन
करणारे पवाडे स्वर्गात गात असतात. (16)
स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणामयमपा-
मपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति।
मुदा यं गायन्ति द्युतलमनवद्यद्युतिभृतः
समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः।।16
अन्वय -भो मातः , स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणां ते अपां अपारः अयं
महिमा जगति जयति। अनवद्यद्युतिभृतः स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः द्युतलं समासाद्य अद्यपि
मुदा यं कः अपि गायन्ति । (16)
भो मातः - हे आई;
स्वभावस्वच्छानां - नैसर्गिकपणे निर्मळ असलेल्या; सहजं –
अनायासाने; शिशिर – शीतल अशा ह्या तुझ्या; अपां – उदकांचा; अपारः – अथांग,
निरवधि असा; अयं – हा; कः अपि – अगम्य, लोकोत्तर; महिमा-
मोठेपणा; जगति – जगात; जयति – सर्वोत्कर्षाने राहतो;
सगरजाः – सगर राजाचे राजपुत्र; अनवद्य – निर्दोष, कलंकरहित; द्युति
– कांती, प्रभा; बिभ्रति -
धारण करतात ते; द्युतिभृतः –देदिप्यमान,
कान्तिमान असे; स्फुट – प्रकट; पुलक - रोमांच; सांद्र – मृदुल
स्पर्शी; स्फुटपुलकसान्द्राः – मृदुलस्पर्शी रोमांचानी रोमांचित झालेले
(सगरपुत्र); द्युतलम्- स्वर्ग लोक; समासाद्य- प्राप्त करून
(स्वर्गात) पोचून ; अद्यापि – अजूनही, इतका काळ लोटला तरी; यं – जो
( अगम्य महिमा), मुदा – आनंदाने; गायन्ति – गातात.
तुझे पाणी आहे नितळ सहजी शीतल सखे
कसे वर्णावे ते सलिल महिम्यासी अमर गे ।
तुझ्या पुण्यस्पर्शे सगरसुत हो धन्य सगळे
अगे राखेतूनी फिरुन उठले दिव्यतनु ते ।। 16.1 ।।
पहा झाले रोमांचित मृदुल ते कोमल तनू
कलंकांचे प्रक्षालन घडुन तनु हो उज्ज्वल जणु
अती आनंदाने सगरसुत भारावुन हृदी
विमानाने आले मुदित सगळे स्वर्गसदनी ।। 16.2 ।।
हजारो वर्षांचा समय जरि गेलाच सरुनी
अजूनीही स्वर्गी सगरसुत ते हर्षित मनी
तुझा गाती ‘तो’ गे सकल महिमा अद्भुत अती
सदाचाराची ही तव विजयगाथा झळकती ।। 16.2 ।।
--------------------------------------------------
Comments
Post a Comment