जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण)

 जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण)


                  
पेरुभट्ट आणि लक्ष्मी ह्या अत्यंत विद्वान तेलंगी ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्मलेला जगन्नाथराय हा मुलगा गङ्गालहरी ह्या काव्याचा कवी. वडिलांनाच महागुरू मानून त्यांच्याकडूनच जगन्नाथाने विद्या संपादन केली. (त्यांच्या रसगंगाधर ह्या ग्रंथात वडिलांचा महागुरू असा उल्लेख आहे.) जगाला दीपविणारी विद्वत्ता, उत्तम शरीरसंपदा आणि तारुण्य असलेल्या ह्या सरस्वतीच्या पुत्रावर लक्ष्मीची कृपादृष्टी नव्हती. अर्थातच त्याच्या महत्वाकांक्षी मनाला स्वस्थ बसणे मानवले नाही. त्याने सरळ दिल्लीची वाट धरली.

             मोगल साम्राज्यात शहाजहानच्या पदरी तो स्थिरावला. बादशहाची मुलगी लवंगिका ह्या तडफदार कवीवर भाळली होती. एक दिवस बादशहा शहाजहान आणि जगन्नाथ पंडित बसलेले असतांना अचानक लवंगिका तेथे आली. बादशहाने ह्या शीघ्रकवीला स्वतःच्या मुलीवरच त्याक्षणी काव्य करुन दाखवायची आज्ञा केली. जगन्नाथ पंडिताची रसवंती पाझरु लागली. त्याने केलेले ते उत्तम काव्य ऐकल्यावर प्रसन्न झालेल्या बादशहाने त्याला `काय पाहिजे ते माग' असं सांगितले आणि जगन्नाथ पंडिताने लवंगिकेचीच मागणी केली. एक तर जगन्नाथ पंडिताचं वय लवंगिकेपेक्षा बरच जास्त होतं आणि तो हिंदू म्हणजे बादशहाच्या दृष्टीने काफर होता. पण-- नाईलाजाने बादशहाला त्याची मागणी पूर्ण करायला लागली. बादशहाने जगन्नाथ पंडिताला घर,सम्पत्ती जहागिरीही दिली.

पण  एका यवन कन्येबरोबरचा तो विवाह हिंदू आणि मुसलमान दोन्ही पक्षांना सारखाच अमान्य होता. औरंगजेब राज्यावर  आल्या आल्या त्याने  जगन्नाथ पंडिताची जहागिरी, संपत्ती जप्त केली. दोन्ही समाजाने वाळीत टाकलेला  जगन्नाथ पंडित उघड्यावर पडला. त्याला गंगामातेच्या किनार्‍याशिवाय कोणाचाच आधार उरला नव्हता. एक दिवस पहाटे लवंगिकेच्या उरलेल्या एकमेव वस्त्रावर स्वतःच्याही शरीराची लाज झाकत लवंगिकेजवळ गंगेच्या घाटावर झोपलेल्या जगन्नाथ पंडिताकडे अप्पय्या दीक्षितांची नजर गेली. अप्पय्या दीक्षित  ह्या व्याकरण पंडितांने आधीही हा कसला कवी?’ म्हणून जगन्नाथ पंडितांची वारंवार अवहेलना केली होती. आता तर दयनीय अवस्थेत झोपलेल्या जगन्नाथाला पाहून   अप्पय्या दीक्षित खवचटपणे म्हणाले,--

‘‘किं निःश्शङ्कं शेषे शेषे वयसि त्वमागते मृत्यौ।

अथवा सुखं शयीथाः निकटे जागर्ति जाह्नवी भवतः।।’’

 ‘‘अरे, मृत्यू जवळ आल्यावर जीवनाच्या अंतिम समयी सुद्धा काही लाज लज्जा न बाळगता कोडग्यासारखा झोपतोस तरी कसा?’’  निर्धन झालेल्या जगन्नाथ पंडिताला हिणवत परत तो म्हणला,झोप बाबा सुखाने झोप. तू झोपलास तरी तुझ्याजवळ गंगा तर सतत जागी आहे!’’ सर्व ऐश्वर्य तर कधीच निघून गेलं आहे. गंगेच्या घाटाशिवाय तुला रहायला घर कुठे आहे? गंगेशवाय तुला कोणाचा आसरा नाही. हे जणू त्याचे ळजळीत शब्द सूचित करत होते. अप्पय्याच्या वाग्बाणाने विद्ध झालेला जगन्नाथ अप्पय्याला काही बोलला नाही. पण मनातील उठलेलं काहूर शांत कसं होणार? ‘खरय माय’, त्याने गंगेकडे दृष्टिक्षेप टाकला. ‘तुझ्याशिवाय मला दुसरं आहेच कोण? आणि माय तू असलीस तर दुसरं कोणी असायला कशाला पाहिजे?’ मनात उचंबळून आलेल्या सर्व भावना अनन्यभावाने गंगेच्या स्तुतीपर एका एका श्लोकातून उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागल्या. जणु गंगेपर्यंत उतरण्यासाठी--- नव्हे नव्हे गंगेने एक एक पायरी वर चढत येण्यासाठी बावन्न श्लोकरूपी पायर्‍या असलेला गंगालहरींचा मनोरम घाट जगन्नाथ बांधत होता. गंगेसाठी पायघड्यांप्रमाणे अंथरलेल्या मखमली रत्नजडित श्लोकांवरून गंगेला एक एक पायरी चढून वर यायला भाग पाडलं त्यानं. बावन्न पायर्‍या चढून शेवटच्या श्लोकाला जगाने दूर लोटलेल्या ह्या आपल्या पुत्राला लवंगिकेसह तिने आपल्या कुशीत घेत आपल्यात सामावून घेतलं तीच ही गंगालहरी! जगन्नाथ पंडित आपल्या काव्याला  पीयूषलहरी म्हणतात. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’ म्हणजे मी दिल्लीश्वराच्या पायी तरी राहीन किंवा जगदीश्वराच्या तरी पायी लीन होईन असे म्हणणारा हा महाकवी संस्कृत साहित्याला मोलाचे योगदान देऊन गंगेत विलीन झाला.

मित्रांनो, एखादी अमर कलाकृती टोकदार भाल्याप्रमाणे हृदयात घुसते आणि कायमची तिथेच विसावते. त्यातील भावभावनांच्या छटा मनात कायमचं काहूर माजवून जातात. अस्वस्थ करतात. चकवा लागल्या प्रमाणे त्याच्याभोवतीच मनाला  फिरत ठेवतात.  

               17 मे ते 25 मे ला येणार्‍या गंगादशहराच्या निमित्ताने ह्या अनुपम स्तोत्राचा आस्वाद मराठीतही घेता यावा म्हणून  गंगालहरींना मराठीत विश्लेषण आणि भावानुवादित करुन उद्यापासून आपल्यासारख्या रसिकांसमोर ठेवत आहे. ह्या गंगालहरी वाचतांना आपल्या मनात आनंदलहरी निर्माण करतील अशी आशा आहे.

--------------------------------------

हे नीरगात्री गंगे, तू उताराकडे वहात जाणारी निम्नगा! पण हे माय, तुझ्या भक्तांना मात्र तू बोट धरून वैराग्याची एक एक पायरी चढवत नेतेस आणि स्वतः स्वर्गापर्यंत पोचणारा स्वर्गसोपान होतेस. माय, जगाने झिडकारलेल्या तुझ्या निःसीम भक्ताला जगन्नाथ पंडिताला आणि लवंगिकेला लेकरांप्रमाणे तू कायमचं तुझ्या कुशीत घेतलस. त्याच्या पीयूष लहरींच्या अमृतस्पर्शाने जगन्नाथ आजही अमर झाला. जगन्नाथाचा ‘‘प्राणप्रयाणमहोत्सव’’ मी ‘गंगालहरीं’च्या साक्षीने अनुभवणार आहे. तुझ्या शांत गंभीर लहरींप्रमाणे हे ‘शिखरिणी’ वृत्त शब्दांना एकतारी प्रमाणे मंद सुरेल साथ देत राहील. त्याच्यासवे माझा मराठी भावानुवादाचा छोटासा दीप, तुझ्या प्रवाहात सोडत आहे. त्याला तुझ्या लहरींसवे डुलत डुलत पार करव.

गुणाढ्याने लिहीलेल्या बृहत्कथा ह्या विशाल ग्रंथांचे एक एक पान वाचून तो अग्नीत अर्पण करत गेला आणि अग्नी त्याला भस्मसात करत गेला. तुझे तसे नाही. तू सर्वांना तारून नेतेस. खवळलेला भवसागरही पार करवतेस; म्हणून, तुझ्या प्रवाहात सोडलेला भावार्थदीप लाटांसोबत जपून पुढे नेशील ह्या विश्वासाने तो तुला अर्पण करत आहे.

लहानपणी माझ्या हाती गंगालहरीचा अनुवाद ठेवणार्‍या वामन पंडित , ल.गो. विंझे, द.कृ. पाध्ये ह्या पूर्वसुरींना नमन करून मी गंगालहरीचा भावानुवाद/ गद्य-पद्य विश्लेषण काव्यात सांगत आहे. 

------------------------------------


श्लोक 1

हे गंगा मैय्या तुझ्या ह्या निर्मल जलाचा महिमा मी काय आणि कसा वर्णन करू? तुझ्या निर्मल जलाची गोडी, विपुल जलौघाचा विशाल विस्तार, जलाचा निरंतर टिकणारा ताजेपणा सर्वच अलौकिक आहे. (तळटीप पहावी)  

‘‘हे गंगामाते, वसु म्हणजे धन, दौलत. ही  वसुंधा सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने सम्पन्न आहे. परंतु ह्या वसुंधरेला सम्पन्न, वैभवशाली करण्यात तुझं योगदान फार मोठं आहे. तुझ्या सहभागाविना ही धरित्री इतकी सुजला, सुफला, सस्य श्यामला झाली नसती.  तिची खरी समृद्धी, सम्पन्नता, श्रीमंती ही तूच आहेस. 

गंगा जल हेच तुझं स्वयंसिद्ध ऐश्वर्य आहे. तुला ते उदारहस्ते शिव, विष्णु वा कोणत्या देवाने बहाल केलेलं नाही तर, ते तुझं अंगभूत ऐश्वर्य आहे. तुझं हे निर्मल जल तुला सर्वोच्च पदी विराजमान करतं.  तुझं हे ईशित्व, योग्यता, सामर्थ्य, सम्पन्नता, निरिच्छता, दुसर्‍याला उदारहस्ते ऐश्वर्य प्रदान करण्याचा मोठेपणा, तुझी दीन दुःखितांविषयी असलेली करुणा, प्रेम ह्या सर्व गुणांमुळेच तर भगिरथाने तुला भूतलावर आणलं. आणि तूही सर्व सगर पुत्रांचा उद्धार केलास.  

ज्याप्रमाणे अलंकारांनी नटलेल्या लावण्यवतीला माथ्यावरचा सौभाग्याचा कुंकुमतिलक विशेष शोभून दिसतो त्याप्रमाणे ह्या वसुंधरेवर सौभाग्याचा तिलक लावल्याप्रमाणे तुझं गंगाजल मनोरम आहे. हे गंगा जल ह्या वसुधेचं सौभाग्य आहे.

तुझ्या प्रवाहात कधी जलाची कमतरता नसते. तुझा विशाल जलप्रवाह  अलोट जलानी तुला समृद्ध करतो. तुझं जल अनेक गुणांनी श्रीमंत आहे. ते अमृताप्रमाणे मधुर आहे.

माय! बाळाच्या मुखातून निघालेल्या सुभाषिताने जसा आईचा सुसंस्कृपणा कळतो तशी तुझ्या तीरावरील समृद्धी पाहून तुझ्या जलाच्या महान ऐश्वर्याचा सहज अंदाज करता येतो. तुझ्या जलाच्या सम्पन्नतेची , वैभवाची चुणूक  तुझ्या तीरावरची सुबत्ता, मुबलकता पाहून समजते. तुझे किनारे सुजल असल्याने धनधान्य, तरुलता, वनश्री, पक्षी, प्राणी आणि मानव संस्कृतीं हयांची कायम भरभराट करत राहतात. हे भगवती गंगे, समग्र ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, पूर्ण ज्ञान, पूर्ण वैराग्य ह्या सहांच्या समुच्चयाला भग म्हणतात. हे परम ऐश्वर्य तुझ्यापाशी असल्यानेच तुला ‘भगवती गंगे’ असं संबोधलं जातं.

आद्य शंकराचार्य तुझं वर्णन करताना म्हणतात,

त्रैलोक्याचे असे तू, त्रिभुवनजननी सार सामर्थ्य,शक्ती ।

येई ना या जलाची, लवभर सरही ,वस्तुसी कोणत्याही ।।

 

अक्राळविक्राळ, बलाढ्य संकट असो वा भीषण समस्या; त्यांना छिन्नविच्छिन्न करण्यासाठी शिव समर्थ आहे. नित्य शस्त्रसज्ज आहे. त्यासाठीच त्याने हातात कायम परशू धारण केला आहे. म्हणूनच शिवाला खंडपरशू म्हणतात. तो देवांचाही देव महादेव जणु काही खेळाखेळात करावीत इतक्या सहजगत्या हे 14 भुवनांचं सर्व विश्व निर्माण करतो. ज्या महादेवाच्या पायाशी सर्व प्रकारचं अद्भुत सामर्थ्य, ऐश्वर्य लोळण घेतं, त्या महादेवालाही गंगा हे त्याचं महान ऐश्वर्य वाटतं. म्हणून तो तिला आपल्या माथ्यावर धारण करतो.

चांगल्या मनाच्या लोकांना सुमन म्हणतात. देवांनाही सुमन किंवा सुर म्हणतात.(सुष्ठ राति - सुष्ठु म्हणजे जनहिताचं, कल्याणकारी. राति म्हणजे देतात ते सुर!  ) देव कायम लोकांच्या हिताची कामं करतात. म्हणुनच त्यांना सुर म्हणतात. देव जी काही सत्कृत्य करतात, लोकांच्या हिताचं काम करतात, त्याचं दृश्य स्वरूप, कृतीचा परिपाक/परिणाम म्हणजे तूच आहेस. कारण जगाच्या हितासाठी झटण्यापलिकडे तू काही जाणत नाहीस. 

तुझा हा विशाल प्रवाह कायम सर्व भूतमात्रांचं कल्याण करण्यासाठीच वाहत असतो. माय, वेद तरी वेगळं काय सांगतात गं? ‘‘ विमोह टाकुन कर्मफळाचा सिद्ध होई पार्था । कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था’’ हेच तर सांगतात ना? तुझं नावच गंगा! गंगा म्हणजे कायम पुढे पुढे जाणारी. मागे वळूनही तू पहात नाहीस. दोन्ही किनार्‍यांना सुबत्तेचं भरभरून, विपुल दान देऊनही तुझ्या निरिच्छ मनाला कुठल्याही फळाची आशा नाही.

पतित-पावना हे जननी मम। परोपकारास्तव तव जीवन

तुझ्या तिरावर राहती त्यांचे। कौतुक पुरविसी कल्पलतेसम

 चारही वेदांची शिकवण सत्यात आणणारा असा हा तुझा जलप्रवाह आहे. माय, तुझ्या तीरावर विचारांनी समृद्ध असलेल्या संस्कृतिंचा उदय झाला. त्यांची भरभराट झाली; वेद हे त्याचंच फलित आहेत. ह्या वेदांचं सारं सर्वस्व तूच आहेस.

अमृताहून गोड असलेलं तुझं पाणी अनेक जीवांना जीवन देणारं आहे. अमृत मृतांना संजीवनी देतं. त्याप्रमाणे सर्व जीवसृष्टीला संजीवनी देण्याचं काम तू करतेस. जीवन प्रदान करतेस. त्यांना जगवतेस, फुलवतेस, समृद्ध करतेस. अमृत आणि अमृतासमान तुझं गोड पाणी ह्यात काही अंतर आहे असं मला वाटत नाही.

तसं पाहिलं तर ही सुधा आणि तुझी ही सुधाधारा दोघीही जणु जुळ्या बहिणी वाटाव्या इतकं तुमच्यात साम्य आहे. तुमच्या कृती सर्व जीव जंतूना उत्तम आयुष्य आरोग्य देतात. जीवन प्रदान करतात. तू समुद्राला मिळतेस तर सुधा ही सिंधूतच होती. समुद्रमंथनाच्यावेळी ती बाहेर आली. समुद्रातून बाहेर आलेला सुधांशु(चंद्र) हाही अमृत किरणं बरसवत असतो.  त्यामुळे सुधा, सुधांशु आणि गंगा तुम्ही एकमेकांची भावंडे आहात. सुधा आणि सुधांशु प्रमाणे शांत, शीतल, निस्वार्थपणे वाहणारा हा तुझा जलौघ हित, कल्याण, परोपकार करतच पुढे जातो.

केले विश्व पवित्र मंगलमयी पृथ्वीस आनंदवी

श्रद्धास्थानचि वाटते मम हृदी ऐसीच भागीरथी

नाशी पाप अमंगलास अवघ्या दुःखे करी दूर जी

माझे रक्षण ती करो; मम हिता पाहो सदा जाह्नवी।।

--------------------------------


(तळटीप - गंगाजलामधे असलेले बॅक्टेरिओफेज नावाचे उपयोगी बॅक्टेरिया  गंगेच्या पाण्यातील बाकी विषाणुंना खाऊन टाकतात. गंगाजलात असलेलं गंधकाचं सूक्ष्म प्रमाण आणि ऑक्सिजनचा असलेला एक विशेष प्रकार (ड्युटेरॉन नावाचा आयसोटोप) गंगेचं पाणी स्वच्छ ठेवतो. ह्या विशिष्ट द्रव्यांमुळे आणि विशेष अशा सूक्ष्म जीवांमुळे इतर सर्वसाधारण पाण्याप्रमाणे गंगाजल कधी खराब होत नाही, नासत नाही.)


(वृत्त- शिखरिणी  अक्षरे - 17, गण- य म न स भ ल ग यति - 6, 11 )

समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्-

महैश्वर्यं लीलाजनितजगतः खण्डपरशोः।

श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां

सुधासोदर्यं* ते सलिलमशिवं नः शमयतु ।। 1 ।।

अन्वय -  भो गंगे, सकलवसुधायाः  किमपि समृद्धं सौभाग्यं , लीलाजनितजगतः खण्डपरशोः महैश्वर्यं, श्रुतीनां सर्वस्वं, सुमनसां मूर्तं सुकृतं, अथ सुधासोदर्यं तत् ते सलिलं , नः शमयतु (1)


(भो गङ्गे!) हे गंगे ते- तुझे  तत् – ते सलिलं- जलप्रवाह नः – आमच्या अशिवं – अपवित्र शमयतु – शमवो. नाश करो. यत् - जे   सकल वसुधायाः – संपूर्ण पृथ्वीचे किमपि – अवर्णनीय, अमूल्य समृद्धं - समपन्नता सौभाग्यं - , लीलाजनितजगतः – ज्याने विना सायास ही 14 जगे निर्माण केली आहेत तो  खण्डपरशोः – शत्रूचे खंडन/ नाश करणारा परशु ज्याच्या जवळ आहे असा शिव महैश्वर्यं- असीम सम्पत्ती श्रुतीनां - वेदांचे सर्वस्वं – संपूर्ण धन सर्वस्व, सुमनसां- पवित्र मनाच्या देवांचे मूर्तं -मूर्तिमंत सुकृतं - पुण्य सुधासौंदर्यं - अमृतासमान शोभा / सुधासोदर्यं – अमृताची बहीण असणं.


(सुधासोदर्यम्सुधा म्हणजे अमृत हे समुद्रमंथनातून बाहेर आले तर गंगा समुद्रात विलीन होते. एकाच समुद्राच्या पोटी असलेल्या या जणु सख्या बहिणीच आहेत. त्यांचे गुण ही सारखेच आहेत. दोघीही कल्याणकारीच आहेत असा अर्थ अभिप्रेत आहे.  काही ठिकाणी सुधासौंदर्यम् असा पाठही आहे. अर्थात ह्याचाही अर्थ अमृताप्रमाणे सौंदर्य असलेली म्हणजेच कल्याणकारी असाच आहे. )    

खुले भाळी जैसा तिलक जणु लावण्यवतिसी

तसे गंगेचे हे सलिल नटवी ह्या अवनिसी ।

असे सौभाग्याचे प्रतिक जल हेची धरतिचे

असे गंगामाते तव सलिल ऐश्वर्य क्षितिचे ।। 1.1 ।।

 

सदा राहे तूची मधुर जलसम्पन्न सरिते

असे कल्याणाची सुखद पुतळी तूचि सरिते ।

तृषार्ता पृथ्वीची शमविसि तृष्णा तव जले

असे गंगाम्बु हे विभवचि स्वयंसिद्ध तव गे ।।1.2 ।।

 

सुधाधारा ह्या गे हरित अवनी ही फुलविती

तुझ्या मार्गामध्ये उधळण सुखाचीच करिती ।

फळांनी पुष्पांनी नटवि वसुधा तू सुरधुनी

महीची तृप्ती तूबहु सुख समाधान असशी ।। 1.3।।

 

जयाच्या खड्गाने रिपु सकल ते दुष्ट वधिले

जगाची उत्पत्ती अति सहज ज्या खेळचि असे ।

अगे शंभू तोही तव सलिल सामर्थ्य बघुनी

तुला सन्मानाने मिरवित असे का नित शिरी ।। 1.4  ।।

 

तुझी धारा शुभ्रा स्फटिक धवला शुद्ध सरिते

सुधेची तू शोभे भगिनि दुसरी कल्पलतिके  ।

असे तू वेदांचे उजळ अवघे पुण्य बरवे

असे वा देवांचे सुकृत नयना जे दिसतसे ।।1. 5 ।।

 

सुधेलाही जिंके मधुमधुर हेची जल तुझे

मृतालाही ज्याने अति सुखद संजीवनि मिळे ।

सदा चैतन्याने उसळत असे जे जल तुझे

अनर्थांसी सार्‍या नित शमवु दे माय मम गे ।।1.6 ।।

----------------------------------------

श्लोक 2

हे माते तू तर गुरूमाऊली आहेस. तुझ्या प्रवाहाकडे एकदा नुसती नजर जरी टाकली तरी हटत नाही. तुझ्या विशाल प्रवाहाकडे पाहता कोणीही आपल्या कोत्या कूपमंडूक प्रवृत्तीचा त्याग करेल. तुझी धीर गभीर धारा पाहून मनाचा उथळपणा जाऊन त्याच्या विचारांना सद्गुणांची, सद्विचारांची, सत्प्रवृत्तिची खोली लाभेल. तुझा निरंतर वाहणारा प्रवाह मनातील आळसही वाहून नेईल. सर्व भूतमात्राच्या हितासाठी समर्पित केलेलं तुझं जीवन पाहता मनातील स्वार्थी, तुच्छ विचार, लोभ, मोह कसे बरं टिकतील? तुझा सर्वांप्रति समभाव पाहून मी, माझा, माझ्यासाठी असे संकुचित स्वार्थी विचार वाहून जातील.

माय! अर्धवट ज्ञान किंवा अज्ञानाचा अंधार मोठी विचित्र परिस्थिती निर्माण करतो. अर्धवट उजेडात दोरीही सापासारखी दिसू लागते त्याप्रमाणे अज्ञानामुळे नाही नाही त्या गोष्टी खर्‍या वाटतात. तर योग्य गोष्टींचं आकलन होत नाही. लहानपणी विचारांना परिपक्वता नसल्यामुळे ज्या बागुलबुवाची क्षणोक्षणी धास्ती वाटते. तो बागुलबोवा थोडी समज वाढताच नष्ट होतो. माय! त्याप्रमाणे ज्ञान, विद्येचा अभाव मनात अविद्येचा, भयाचा एक महा प्रचंड, काल्पनिक वृक्ष तयार करतो.

 

काही अंजन इतकी प्रभावी असतात की, त्याच्यामुळे इतरांना सहजी न दिसणार्‍या गोष्टी त्याने दिसू लागतात. गुरू ज्ञानरूप अंजन जेव्हा शिष्याच्या डोळ्यात घालतो, तेव्हा त्याला ज्ञानाची अज्ञानभेदक दूरगामी नजर प्राप्त होते. तुझा हा अमोघ जलौघ माणसाच्या मनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू आहे. ज्ञानाच्या प्रकाशाचं अस्तित्व हे अज्ञानाचा अंधार, भयाचा बागुलबोवा तात्काळ दूर करतात.

हे माय, धनाची समृद्धी तर तुझ्या ह्या जलौघामुळे लाभतेच लाभते. अजून मनाच्या कोतेपणला, मनाच्या दारिद्र्याला तू दूर करतेस. तुझा हा अखंड वाहणारा प्रवाह आमच्या तन मन धनास अजून समृद्ध करो. (2)

 

दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां

द्रुतं दूरीकुर्वन्सकृदपि गतो दृष्टिसरणिम्।

अपि द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुरिह

प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु न:।। 2 ।।

अन्वय – (भो गंगे), इह दृष्टिसरणिं सकृत् अपि गतः (सन्) दरिद्राणां दैन्यं , अथ दुर्वासनहृदां दुरितं अपि द्रुतं दूरीकुर्वन्, द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुः अयं ते वारां प्रवाहः, नः अपारां श्रियं दिशतु।(2)

अन्वयार्थ - (भो गङ्गे! ) इह दृष्टिसरणिं - नेत्रमार्गाप्रत सकृत् अपि – एकदा जरी  गतः(सन्) – प्राप्त झाला असता दरिद्राणां दैन्यं – दीन जनांचे दारिद्र्य, अथ- आणि दुर्वासनहृदां – ज्यांच्या मनात दुष्ट वृत्ती राहते असे, पापी पुरुषांचे दुरितं - पाप अपि- सुद्धा दृतं- तात्काळ दूरीकुर्वन्- दूर करणारी द्राक् - शीघ्र अविद्याद्रुमदलनदीक्षागुरुः- माया, अज्ञान, मूर्खपणा त्यांचा जो द्रुम म्हणजे वृक्ष त्याच दलन म्हणजे खंडन करण्याची दीक्षा देणारा गुरू  अयं – (जो) हा, , ते- तुझा वारां प्रवाहः – जळाचा प्रवाह, नः -  आम्हाला अपारां- अपरिमित श्रियं- सम्पत्ती दिशतु- देवो. ।

जलौघासी पाहे निमिषभर जो दीन कुणिही

तयाच्या दैन्याची जननि न निशाणीहि उरवी

 मनी दुष्टांच्याही कणव अति निर्माण करिसी

प्रवृत्ती पापाची सकल करिसी ध्वस्त मनिची ।।2.1

 

मनी फोफावे जो  सघन तरु अज्ञानस्वरुपी

करी त्याचे उन्मूलन सहजि लाटा सुरधुनी

गुरू तो शिष्याला सजग करी ज्ञानांजनबळे

जलाने गे तैसे मम सकल अज्ञान हरणे।।2.2

 

गुरू माऊली तू तवची जलधारा पुनित ही

मनाच्या अज्ञाना अति जलद टाकी निरसुनी ।

तुझी धारा वाहे अविरतचि माते सुखमयी

हरो ती पापांना करुनि मजला मंगलमयी ।। 2.3

-------------------------------------------------------

श्लोक 3

कुठल्या मनस्विनी स्त्रीला सवत आवडेल? आपल्या पतीने क्रोधाने सर्व जगाचा नाश केल्यावरही, जी पत्नी कुठलाही राग व्यक्त न करता, फिरून सर्व विश्व तितक्याच आस्थेने निर्माण करते; अशा कर्तबगार पार्वतीला तर सवत कशी रुचावी?  ती सवत जर सुंदर, सुस्वाभावी, सुशील, कुलीन गंगा असेल आणि पतीने तिला त्याच्या डोक्यावर बसवलं असेल तर पत्नीला राग येणं स्वाभाविकच आहे. पार्वतीच्या तळपायाची आग मस्तकी गेल्यावर प्रत्यक्ष महादेवांनाही तिच्या लाथेचा तडाखा माथ्यावर सहन करायला लागला.  (त्याची रोचक गोष्ट तळटिपेत देते) मग प्रत्यक्ष सवतीला म्हणजे गंगेला हिमाद्रिकन्येची दहशत वाटणं उचितच आहे.

सूर्य उगवल्यावर जसं काही लपून रहात नाही, सर्व काही स्व्छ दिसतं त्याप्रमाणे महादेवांच्या आणि गंगेच्या नात्याचे बिंग  फुटले आणि उमादेवींना सर्व प्रकार जेव्हा अवगत झाला तेव्हा गिरिजेचा महा राग माहित असल्याने गंगेचा नुसता थरथराट  होणं स्वाभाविकच आहे. जणु काही तिच्या लाटा गगनाला भिडल्या. गंगेचं उसळणारं पाणी पाहून कवी मनाच्या जगन्नाथाच्या कल्पनाशक्तीचा वारूही  भरधाव उधळला नाही तरच नवल!

ह्या श्लोकात पंडितराय म्हणतात, पतिचं हे कपट उघड होताच, पार्वतीचे नेत्र महादेवांच्या माथ्यावरील जटाजुटांमधे खेळणार्‍या, अल्लडपणे बागडणार्‍या गंगेला पाहून, उदयाचलावर येणार्‍या लालबुंद सूर्यबिंबाप्रमाणे रागाने लाल झाले आहेत. हे जननी, हे गंगा माते, तिच्या भीतीने तर तुझ्या ह्या नीरदेहाचा थरकाप होत नाही? तिच्या जळजळीत कटाक्षाने तर तुझ्या ह्या लाटा उंच उंच उसळत नसाव्यात? ते काहीही असो पण तुझ्या ह्या उंच उंच उसळणार्‍या लाटा सर्व भूतमात्रांचे कल्याणच करतात. तुझ्या भयातही लोककल्याणच दडले आहे.

 

उदञ्चन्मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननी-

कटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः।

भवन्तु त्वङ्गन्तो हरशिरसि गंगातनुभुव-

स्तरङ्गाः प्रोत्तुङ्गा दुरितभयभङ्गाय भवताम् ।। 3 ।।

अन्वयउदञ्चन्मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननीकटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः हरशिरसि त्वगन्तः गङ्गातनुभुवः प्रोत्तुङ्गाः तरङ्गाः , भवतां दुरित भवभङ्गाय भवन्तु ।

अन्वयार्थ

उदञ्चन्मार्तण्ड- उगवणारा सूर्य; स्फुटकपट- कपट स्पष्ट होता; हेरम्बजननी- गणपतीची आई म्हणजे पार्वती; कटाक्ष- नजरेचा कटक्ष; व्याक्षेप- चिरकाल स्थिती; क्षणं – स्वल्पकाळ; जनित – उत्पन्न; संक्षोभनिवहाः- भयांचा समूह; हरशिरसि शिवाच्या माथ्यावर; त्वङ्गन्तः – कापतात, थरथरतात. गङ्गातनु – गंगेची तनू म्हणजे देह म्हणजे तिचा प्रवाह; भुवः – उत्पन्न होतात; प्रोत्तुङ्गाः तरङ्गाः -अत्यंत उंच उंच लाटा;  भवतां -  तुम्हा भक्त जनांच्या दुरितभय- पाप,भय,भीती भङ्गाय भवतु – त्याचा भंग, नाश होवो ।

 

तुला मोहूनी गे शिव करि शिरी धारण तुला

लबाडी शंभूची पुरति कळता ती गिरिसुता ।

असूया ईर्षेने मनि जळफळे पेटुन उठे

हृदी गौरीच्या त्या जहरि सवतीमत्सर उठे ।। 3.1।।

 

तिच्या नेत्रांमध्ये जणु उगवतीच्या रविसमा

प्रकाशे लालीमा जणुचि करण्या खाक तुजला ।

उमा टाकी कैशी जळजळित दृष्टी तुजवरी

अगे पाणी पाणी तव हृदय हो त्या बघुनची ।। 3.2 ।।

 

शिवानीच्या ऐशा तिखटचि कटाक्षांस बघुनी

भवानीचा मोठा फणफुणत  त्रागाच बघुनी ।

भयाने काया का थरथरत राहे तव अशी

जणू वाटे गंगाधर-शिरि पदन्यास करसी ।। 3.3 ।।

 

नभाशी लाटा ह्या तव सहजि स्पर्धाच करिती

जणू त्या स्वर्गाचा अति सहज सोपान बनती ।

तुझ्या या उत्तुंगा लहरी मम कल्याण करु दे

धुवोनी पापांसी  विमल करि सर्वां जननि गे ।। 3.4 ।।

---------------------------------------------------


(तळटीप - सौंदर्यलहरी ह्या स्तोत्रात 86 व्या श्लोकात एक छोटी गोष्ट आहे.

पतीपत्नीमध्ये गप्पा गोष्टी करतांना पतिदेवांना हमखास काही खोचक बोलायची हुक्की येते. तशीच उमेची थट्टा करायची लहर शंभूदेवांना आली खरी पण चुकून त्यांच्या जिभेवरून ‘‘प्रिय उमे’’ ह्या संबोधनाऐवजी ‘‘प्रिये गंगे’’ असे शब्द निसटले मात्र!   ही थट्टा जरा जास्तच झाली. उमेसारख्या तेजस्वी, लावण्यवती, मानिनीला आपल्या पतिमुखातून सवतीचा इतक्या प्रेमळपणे झालेला उल्लेख कसा बरं सहन होईल? सर्व विश्वाचा कारभार चालवणार्‍या, उमेसारख्या मोठा अधिकार असलेल्या पत्नीला तर हे कधीच रुचणार नाहीत. ते शब्द एखाद्या शल्यासारखे तिच्या हृदयात घुसले.

थट्टा करता करता चुकून जिभेवरून निसटलेले शब्द शंभूमहादेवांना महागात पडले. महा भयांकर क्रोधाने उमेची तनुलता थरथरतांना पाहून शिवाला आपल्यावर होणार्‍या अंगार-वर्षावाचा अंदाज आला आणि त्यानी तात्काळ गिरीजेच्या पायांवर त्याचे मस्तक झुकवून क्षमायाचना केली. पण हाय रे हाय! पार्वतीच्या पायांची जोरदार लाथ त्याच्या कपाळावर बसली.

पती-पत्नीच्यामधल्या ह्या भांडणप्रसंगाला कोणी शेजारी प्रेक्षक लाभला तर तो  त्याचा चांगलाच आस्वाद आणि आनंद घेतो. त्यातल्या त्यात तो जर कोणी शत्रुपक्षातला असेल तर मग काय विचारता! त्याला हास्याच्या उकळ्या नाही फुटल्या तरच नवल! येथेही  शिवाचा कट्टर शत्रू हजर होता. बोलून चालून त्याला शरीर नसल्याने तो गिरिजेच्या लोभस चेहर्‍याचा तर कधी सुंदर अवयवांचा आश्रय घेऊन राहतो.  शिवाच्या कपाळावरील अग्निनेत्राने त्याला जाळून अनंग /अंगहीन केले हे शल्य त्याच्या मनात खूप काळापासून होते. त्या अग्निनेत्रावर असा सणसणित लत्ताप्रहार होताना पाहून, आपल्या शत्रूची अशी फटफजिती होताना पाहून, अनंगाला खुदुखुदु हसू येऊ लागले.  शिवमस्तकावरील प्रहारावेळी उमेच्या पायातील पैंजणांमधून त्यावेळी जो किलकिल आवाज झाला तो पैजणांचा नसून आनंदाच्या उकळ्या फुटणार्‍या मदनाच्या उपहास गर्भ खुदुखुद हसण्याचा असावा.अशी श्री आद्यशंकराचार्यांनी केलेली सुंदर कल्पना आहे.

कधी गप्पागोष्टी करित असता गे तुजसवे

जरा खोटे खोटे हसत वदता खोचकपणे ।

मुखी शंभूच्या ये चुकुन ‘‘प्रिय भागीरथि’’ असे

रुचावे कैसे ते वचन अपमानीत करि जे ।। 

 

ढळे जिह्वा ऐसी दुखवि गिरिशाची तव हृदी

तनु कापे त्याने, विपुल उसळे क्रोध हृदयी ।

कळाले शंभूसी धडगत न त्याची लव मुळी

इलाजासी त्याच्या शरण तुज जाणे उचितची ।। 

  

जरी घाली लोटांगण तव पदी शंभुशिवही

कपाळी शंभूच्या त्वरितचि पदाघात करिसी ।

अनंगासी होई सुख बघुन हे दृश्य भलते

म्हणे तो आहाहा! मम विजय हा थोरचि असे ।। )

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3