श्लोक 22
श्लोक 22
गंगेची भरभरून स्तुती करतांना भारावून जगन्नाथ पंडित म्हणाले, हे माय गे! लोक म्हणतील, ‘मी गंगेची इतकी अथक स्तुती करावी अशी गंगा कोण लागून गेली? जगात बाकी नद्या नाहीतच की काय? कितीतरी नद्या गंगेहून दूरगामी असतील. जलौघाने गंगेहून विशाल असतील. ह्या जगात एकाहून एक श्रेष्ठ गोष्टी असतात.’ माय, पर्वतातून निघून समुद्राला मिळणार्या अगणित नद्या आहेत हे मला मान्य आहे. त्या सुंदर असतील, विशाल असतील, दूरगामी असतील, प्राणीमात्रांना मदत करणार्या परोपकारीही असतील पण माय तुझी सर त्यातील कुठल्याच निर्झरिणीला कशी यावी?
हे स्वर्लोककल्लोलिनी, तू स्वर्गातून पृथ्वीवर उतरतांना तुझा प्रचंड आवेग सहन करणं हे महादेवांशिवाय अजून कोणाला शक्य होतं? तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली सारखे भयावह राक्षस आणि त्यांनी पृथ्वीपासून दूर अंतरावर उभारलेली तीन पुरे ह्यांना ध्वस्त करणारे त्रिपुरारारि महादेव ह्यांनी प्रत्यक्ष तुझा स्वर्गातून धो धो कोसळणारा प्रवाह त्यांच्या शिरी, जटांमधे थोपवून धरला. त्यांच्या जटाजुटांमधे बांधून तुझा वेग नियंत्रित केला. अन् त्यांनाही तुझ्या गुणांचा मोह पडला; त्यांनी तुला कायमचं त्यांच्या शिरावर स्थान दिलं. सर्व देवांचे जे देव महादेव त्यांच्या जटाजुटांमध्ये राहण्याचं सौभाग्य अजून कुठल्या नदीला प्राप्त झाल्याचे ऐकिवात नाही. कोणाची ती योग्यताही नाही. तुझ्यासारखी केवळ तूच!
त्या ऐश्वर्यसम्पन्न लक्ष्मीपती भगवान विष्णूंची स्वतःची महती केवढी मोठी! कृष्णावतारात कालिया मर्दनाच्यावेळी, कालियाच्या फण्यावर नृत्य करतांना भगवंताच्या पायाला जे सर्पविष लागले ते धुण्याचे दुःसाहस करायला बाकी कुठली सरिता कशी धजावेल? त्या सर्पविषाचा जहालपणा पाहून बाकी नद्या आपलंही पाणी विषारी, दूषित होईल म्हणून मागे सरकतील. त्याची ती क्षमताच नोहे. पण हे अचाट सामर्थ्य फक्त तुझ्या पवित्र जलात आहे. तू विष्णूचे पाय धुवून पुनश्च ते निर्मळ केलेस. पुन्हा कमलकोमल केलेस. तुझं हे अद्भुत सामर्थ्य, अलौकिक पराक्रम, कितीही दुष्कर काम करू शकण्याची क्षमता बाकी सर्वसाधारण निम्नगांच्या अंगी कशी यावी?
माय, ‘जो न देखे रवी वह देखे कवी ’ अशा अद्भुत कल्पनाविलासाच्या एखाद्या कवीनेही तुझी तुलना एखाद्या मनोहर निर्झरिणी बरोबर करायची ठरवली तरी त्याला ते जमणार नाही कारण तुझ्यासारखी केवळ तूच आहेस. तुझं हे एकमेवाद्वितीय असलेलं सर्वश्रेष्ठपद कायमचं तुझच आहे. माय त्याशिवाय का हा जगन्नाथ तुझी हृदयापासून स्तुती करेल ? (22)
नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कतमया
पुराणां संहर्तुः सुरधुनि कपर्दोऽधिरुरुहे।
कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालि सलिलै-
स्तुलालेशो यस्यां तव जननि दीयेत कविभिः।।22
अन्वय – हे जननि, कविभिः यस्यां
तव तुलालेशः दीयेत ( तादृशी का वर्तते?) हे सुरधुनि, नगेभ्यो यांतीनां तटिनीनां
कतमया पुराणां संहर्तुः कपर्दः अधिरुरुहे । कया वा श्रीभर्तुः पदकमलं सलिलैः
अक्षालि (तत् कथय) (22)
अन्वयार्थ - हे सुरधुनी – हे देवनदी; नगेभ्यः – पर्वतापासून; यांतीनां – वाहणार्या, जाणार्या; तटिनीनां- नद्यांमध्ये ; कतमया – कोणत्या नदीने; पुराणां-तीन पुरांच्या स्वामी असलेल्या त्रिपुरांचा, त्रिपुर नावाच्या राक्षसांचा; संहर्तुः – नाशकर्त्या शिवाचा; कपर्दः – जटाजूट; अधिरुरुहे – निवासस्थान केले? (किंवा) कया वा – वा कोणत्या (नदीने); श्रीभर्तुः – लक्ष्मीच्या पतीचे, विष्णूचे ; पदकमलं – कमळासारखी पाउले; सलिलैः – पाण्याने ; अक्षालि – धुतली; हे कथय – सांग; हे जननि – हे आई; कविभिः – कवीजनांनी; यस्यां – जिला तव – तुझ्या; तुलालेशः -उपमेचा अंश; दीयेत – दिला जाईल.
गिरी जन्मा येती कितिक सरिता हे सुरधुनी
मिळाले का कोणा परि शिवशिरी स्थान कधिही? ।
जलौघाने वा का चरण कमलाकांत हरिचे
करे प्रक्षाळूनी विमल कुणि का निर्झरि स्वये ।। 22.1 ।।
कुणापाशी आहे इतुकि क्षमता गे सुरसरी
तुझ्या तोडीची ना जननि सरिता एकही जगी ।
कवींनी द्याया गे तुजसी उपमा ना दुजि कुणी
नसे तोलामोलाचिच तुजसमा एकहि नदी ।। 22.2 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment